एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

दुर्गा..

मीरा सिरसमकर ह्यांची दुर्गा ( https://www.facebook.com/meera.sirsamkar/posts/524740960935905 ) ही कविता वाचून आम्हाला आमच्या गल्लीतील दुर्गा आठवली

दुर्गा

हलके हलके चालत गेलीस
रस्त्यावरच्या रेषेवरती ,
सर्कशीतली जशी डोंबारीण
चालत असते दोरीवारती .

शुद्ध नसे सुसंबद्ध नसे
तरी टाकीत गेलीस चारपावले ,
पायतळीचे बळ ओळखले
नजर आमुची माथ्यावरती .

नाद न सूटला वाद जगाशी
उधळायाचे स्वप्न उराशी ,
करता करता तुडवित गेलीस
असंख्य गुत्ते पायतळाशी !!

------ केशवसुमार .
( दै . फेसबुक , १० ऑक्टोबर २०१३ )

विश्वाचे मर्म ब्लॉगावरी प्रकाशले ...

आमचे परम जालस्नेही श्री श्री कऱ्हाडेशेठ ह्यांनी आज भर दुपारी आम्हाला पिंगले ..थोड्याच चर्चे नंतर त्यांना 'सरो'निया झाला आहे हे आमच्या लक्षात आले... मी सांत्वनाचे दोन-चार शब्द बोलणार इतक्यात त्यांनी आम्हाला एक फर्मान सोडले...

Joshiउर्फ चिंगीकाकूंची हि पोस्ट वाचा https://www.facebook.com/groups/uthathev/permalink/589472107781981/)... आणि विश्वाचे आर्त (http://www.aathavanitli-gani.com/Song/Vishvache_Aarta) ह्या गाण्याचे विडंबन लिहा..

मी म्हटलं आहो मी वर्साला कार्यालयात आहे...तर ते परत डाफरले... रोज बघतोय तुमची कार्यालयातील कार्ये इथेच उठठेवीवर ...

मग नाइलाजाने आम्हाला त्यांच्या आज्ञेचे पालन करावे लागले... पण वर्साच्या कार्यालयात मिटिंग मिटिंगचा खेळ सुरु असल्यामुळे, विडंबन लिहून झाल्यावर नेहमीप्रमाणे मोठ्यांदा गुणगुणता येईना... तेव्हढ्यात आमचे गाणाराडॉक्टर Patilशेठ रेघेवर आलेले दिसले ... त्यांना विडंबन मोठ्यांदा रेकून बघायची विनंती केली ... आणि त्यांनी ती तत्पर स्विकारली ... काही ठिकाणी मात्राभंग आहे... पण 'सरांपुढे कोणाचीच मात्रा चालत नाही' ...असे प्रस्तावनेत लिहा मग कोणी मात्राभंगाच्या दोषाकडे बघणार नाही असा त्यांनी दिलासा दिला...तुम्हाला त्रास झाला तरी श्री श्री कऱ्हाडेशेठ ना थोडा आराम मिळेल ...म्हणून हे विडंबन इथे द्यायचे धाडस केलं ...

विश्वाचे मर्म ब्लॉगावरी प्रकाशले ।
अवघे चि झालें लोक धन्य ॥१॥

अवकाशेताण खंडामधे विभागणे ।
नवल देखिलें ऋणात्मक गे माये ॥२॥

बाप भौतिकशास्त्रवरू अदितीस भेटला ।
उठाठेवी दाविला 'सरा'कारें ॥३॥

तो हजार खर्डे वाचुन...



स्वामित्वहक्का वर झालेल्या उलट सुलट चर्चा वाचून /ऐकून , या सर्व गदारोळात 'कोलटकर खरे शहाणे' निघाले ह्या निष्कर्षाला मी पोचलो. तरी ह्या चर्चा काही माझी पाठ सोडेना...त्यातच खरेच्या एका पंख्याने 'मी हजार चिंतांनी ..' ही खाऱ्यांची प्रसिद्ध कविता पाठवून दिली...(आता हे करताना त्यांनी खरेंची परवांगी घेतली होती की नाही माहिती नाही ;) ) मग जे नेहमी होते तेच झाले ...


तो हजार खर्डे वाचुन कविता छापवतो
मी जालावर बघतो, परवांगी विन वापरतो !

तो साहित्याच्या 'क्षकिरणां'चा छंदी
मी घाऊक प्रसिद्धी मध्ये या आनंदी
तो स्वमित्वाशी जीव गंजवीत बसतो
मी लंघून कायदा पार निघाया बघतो !

डोळ्यांत त्याचिया सूर्याहुनी संताप
तत्वाचा दिसतो शाप, जरी हा ताप !
तो त्या तत्वांची अभ्येद्य, दणकट -
घडवून ढाल प्रस्थापितांना नडतो !!

मी 'माझे नसून माझे' म्हणुनी लिहीतो
तो तेच घेऊनी दावा लावून बसतो
मी हेतु माझा स्वच्छ सांगतो त्याला
तो शांत मानाने तत्वासाठी लढतो !

मी प्रसिद्ध ! करतो कवितेसाठी सगळे
रसिकांना वेचून निवडक देतो अगळे!
तो मुळात देतो हेतू उधळून माझा
अन्‌ 'वकिलाची ही नोटीस' देऊन जातो !!

मज उदात्त हेतूचाच अता आधार
लपतो न परि हा गुन्हा आत भेसूर !
तो जरी लढावतो हक्क कवीचा तरीही
मज साहित्य प्रसाराचा तो मारक दिसतो !!

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१३

म्हणू ...



Balaji Sutar यांच्या 'हसू...' (https://www.facebook.com/balaji.sutar.3/posts/723574727656926) ह्या कवितेवरून आम्हाला एक आंतरजालीय महान व्यक्तीची आठवण आली...

म्हणू
---------------------------------

ब्लॉग,
एवढा अगम्य,
विरेचीत, की,
सत्यही स्पर्शत नाही,
कुठल्याच अर्थानं.

आरंभापासूनच
जोखणा-या जालवीरांचे
'दुवा'बंद आक्रमण
तुझ्यावर.

सगळी बुरूद -
- लेखक , कवी,
चित्रकार, नट,
संशोधक, इतिहासतज्ञ -
निव्वळ
'सर'पणाच्या खुंट्याशी
जखडलेली.

बाब्बो,

कुठल्या बळावर
असं साहित्यिक म्हणवतोस तू?

---------------------------------
- केशवसुमार, फ्रँकफर्ट.

चला दोस्तहो 'स्वामित्वा'वर बोलू काही !

आमची प्रेरणा सध्या विविध माध्यमे, फेसबुक भिंती आणि समूहातून सुरू असलेली स्वामित्वहक्का वरील चर्चा (?!)

(आता ह्या मुळे कुणाच्या स्वामित्वहक्काचा भंग झाला नसला म्हणजे मिळवलं ;) )


जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो 'स्वामित्वा'वर बोलू काही !

उगा दाखले 'परंपरे'चे देत रहा तू
नडले नाही 'शहाणे' तोवर बोलू काही

निकाल पाहुन टीव्हीवर बडबडले वेडे
'खरे' न खोटे ठरवुन नंतर बोलू काही

हवेहवे संदर्भ तुला जर हवेच आहे
परवांगीला घेऊन नंतर बोलू काही

स्वामित्वाची किती काळजी पेपरमधुनी
छापून टाकू आधी नंतर बोलू काही

असो कायदा हातामध्ये काठी म्हणुनी
हक्क लढाई आहे खडतर बोलू काही

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

लक्तरे...

Balaji Sutar यांची लक्तरे हि कविता (https://www.facebook.com/balaji.sutar.3/posts/722375987776800) वाचून आम्हाला जालावरील काही कंपूबहाद्दरांची लक्तरे आठवली.

लक्तरे...
--------------------------------------------

आजही,
जेव्हा मी वावरतो,
या ध्येय/उद्देश हरवलेल्या
आदिम सनातन समुहात-

ऐकतो-
-निर्मितीमूल्य अन साहित्याचा
विझलेला जयघोष,

-नग्न करून
धिंड काढलेल्या स्टेटस बद्दलचे
भाड्याने आणलेल्या लढवय्यांचे
मुक्त फुल्याफुल्यांकित परिसंवाद,

-'कॉमेंट-हटाव' आणि
'मुद्दा यहीं बनाएंगे' च्या
भंपक गर्जना.

पाहतो,
- कंपूशाहीच्या 'काही'
'कंपूं'कडून स्टेटसवर
झालेले 'शाही' बलात्कार.

निर्विकारपणे,
मनावर एकही ओरखडा
उमटू न देता,
मी मित्रांसोबत चाट करतो,
विडंबन पाडतो,
विंग्लिश सिनेमा पाहतो,
xxxच्या भिंतीवरून चक्कर मारतो..

मग, पहाटे, मी जागताना,
अंतरात्मा झोपी जातो, तृप्तपणे.

माझ्यातला मी
मला सांगतो,
"कसा बनवल मी मुर्ख, आजही?"

--------------------------------------------
-केशवसुमार, फ्रँकफर्ट.

चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून...

Kavita Mahajan यांची https://www.facebook.com/kavita.mahajan.5/posts/3525708997213 हि कविता वाचून आमच्या काही पट्टीचे पिणाऱ्या मित्रांची कैफियत आठवली...

चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून
गटकावा शॉट्ग्लास ओठावर लावून
गडद निळ्या रात्री खच्च भरलेल्य गुत्यावर
जो मिळतो मद्यार्क टाकलेला

कुणीच नसावं गुत्यातही
किंवा असावं संपूर्ण सशरीर सोबत
पायाखालची माती ढगासारखी मऊ
चालतोय चवड्यावर की उडतोय कळू नये

हरकत काय आहे कलीग्सना आणि
साथीदारांना मित्रमैत्रिणींना
बेरंगीखुर्चीला गुत्याच्या दारांना
गव्हाळ रंगाच्या यामासारख्या
मुख्यदारावरच्या शुंभाला
हरकत काय आहे

समजेल
कधी बाटलीवर नजर टाकलीस तर
: तळची काच दिसेल इतकी ढोसलेली असते
की पाय टेकवून चालताच येत नाही
म्हणूनही उडत असतो मी
रात्री अपरात्री.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

चला दोस्तहो ऑर्डिनन्सवर बोलू काही ...

सत्ताधारी पक्षाच्या युवराजांनी ऑर्डिनन्सवर केलेलं सनसनी विधान आणि नंतर त्यावर सर्व वाहिन्यां, फेसबुक भिंतीं , समूहातून झालेली उलटसुलट चर्चांच भूत काही केल्या आमचा पिच्छा सोडेना...शेवटी संदीप खरेंच्या 'आयुष्यावर बोलू काही' ह्या गाण्याच विडंबन झाले आणि आम्हाला त्या भूतापासून मुक्ती मिळाली...

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो ऑर्डिनन्सवर बोलू काही !

उगाच वळसे मतदानाचे घेत रहा तू
झाले नाही पारित तोवर बोलू काही

तुफान पाहुन जनतेचे  बडबडला वेडा
फाडून टाकू त्याला नंतर बोलू काही

हवीहवीशी युती तुला जर हवीच आहे
नकोनकोते भलते यावर बोलू काही

मता-मतांची किती काळजी बघ पक्षातुन
निवडणुका या झाल्या नंतर बोलू काही

व्होट असू दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

युद्ध अम्ही करणार ...

अमेरिकेची आर्थिक परिस्थिती आणि त्यांची युद्धनीती ह्यावर आज बऱ्याच मित्रांच्या भिंतीवर आणि समुहात चर्चा वाचत होतो ...नेहमी प्रमणे कानात जाल संगीत वाजतच होते... शांता शेळकेंचे आनंदघन यांनी संगीतबद्ध केलेलं अप्रतिम गाण 'शूर आम्ही सरदार आम्हाला' सुरु झाले आणि आमचं डोके तिरक चालू लागलं ....

युद्ध अम्ही करणार अम्हाला काय कुनाची भीती ?
तेल, तेल अन्‌ तेलापायी युध्द घेतलं हाती !

हिस्ट्रीच्या गर्भात उमगली झुंजायाची रीत
इकोनॉमीशी युद्ध जोडल त्यावर सारी भिस्त
हवे तेव्हढे छापू डॉलर हीच आर्थिक नीती !

मुजाहिदाना  पुरवुन शास्त्रे तयार आम्ही केले
अंगाशी येताच तयांना अतिरेकी हे म्हटले
लाख कारणे देऊन लढवू अशी आमची ख्याती  !

जिंकावे ना, मधून पळावं हेच अम्हाला ठावं
लढुन पळावं, परत लढावं हेच अम्हाला ठावं
स्वार्थापायी मिडलइस्टची आम्हीच केली माती !